निकृष्ट कामाचा कळस! 21 कोटींच्या रस्त्याची पहिल्याच पावसात धुळधाण – पिंपळनेरात नागरिक संतप्त
📍 स्थान: पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
🗓️ दिनांक: 21 जून 2025
✍️ प्रतिनिधी – अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर शहरातील जे.टी. पॉइंट ते चौफुली मार्गावर तब्बल 21 कोटी रुपयांचा खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्याचे पहिल्याच पावसात धाबे दणाणले आहेत. केवळ महिनाभरात खड्डेमय अवस्थेत परत गेलेल्या या रस्त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाने जनतेच्या कराच्या पैशातून कोट्यवधींचा निधी खर्च करून पायाभूत सुविधा उभारल्या जातात, पण ठेकेदार व प्रशासनातील हलगर्जीपणामुळे "विकास" केवळ कागदावरच दिसतो, असे स्पष्ट चित्र या घटनेतून समोर आले आहे.
📉 काही आठवड्यांतच रस्त्याची पार वाट लागली!
एमएसआरटीसी नाशिकच्या अखत्यारित असलेला 1.5 कि.मी. लांबीचा रस्ता डांबरीकरणाद्वारे नव्याने बांधण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी काहीसा दिलासा घेतला होता. पण पहिल्या पावसातच रस्त्यावर मोठमोठाले खड्डे, साचलेले पाणी आणि वर आलेली बारीक खडी यामुळे नागरिकांच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फेरले गेले.
🗣️ नागरिकांचा सवाल – कोट्यवधी रुपये कुठे गेले?
रस्त्याचे काम होत असताना यंत्रणा ‘वॉच’वर नव्हती, गुणवत्तेची तपासणी न करता काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. "हा काय 'अच्छे दिन'चा नमुना आहे का?" असा उपरोधही केला जात आहे.
🧱 ठेकेदाराचे स्पष्टीकरण – अजून एक लेयर बाकी आहे!
ठेकेदाराचे प्रतिनिधी इंजिनीयर शरद माने यांनी स्पष्टीकरण दिले की,
"रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांनी मुरुम टाकल्यामुळे पाणी रस्त्यावर साचले आणि डांबर उखडले. शिवाय, अजून एक लेयर टाकणे बाकी आहे. पाच वर्षे देखभाल आमच्यावर आहे, पावसाळ्यानंतर दुरुस्ती करू."
मात्र, हा खुलासा नागरिकांना समाधानकारक वाटलेला नाही. 'रस्ता वापरण्यायोग्य नसताना सार्वजनिक वापरासाठी खुला कसा ठेवला गेला?', हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
📢 नागरिकांची मागणी – दोषींवर कठोर कारवाई करा!
संपूर्ण रस्ता नियमावलीनुसार नव्याने तयार करावा, तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर व त्यास मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी सध्या नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
📸 छायाचित्र: अंबादास बेनुस्कर
