राज्यात पत्रकारांवरील हल्ल्यांमुळे माध्यमविश्वात अस्वस्थता – राजकीय वरदहस्त व पोलिसांच्या धाकाची दडपशाही सहन केली जाणार नाही
मुंबई | प्रतिनिधी गोकुळ देवरे
महाराष्ट्रात पत्रकारिता करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. पत्रकारांवर हल्ले, खोटे गुन्हे, धमक्या आणि दबाव वाढत असल्याने माध्यमविश्वात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अलीकडील कर्जत येथील घटनेने पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खालापूर तालुक्यातील सावरोली येथील के. डी. एल. बायोटेक या औषध उत्पादन कंपनीला बंद होऊन तब्बल १२ वर्षे झाली आहेत. तरीही संबंधित कामगारांना त्यांचा हिशोब मिळालेला नाही. या अन्यायाविरोधात २ जुलै २०२५ रोजी कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर निदर्शने केली. त्या वेळी झालेली भाषणे ‘संवाद’ मराठी चॅनलवर थेट प्रसारित करण्यात आली.
ही माहिती देणे हे पत्रकारांचे कर्तव्य असतानाही, संकेत भासे यांनी पत्रकार बाबू सीताराम पोटे यांच्यावर बदनामीचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी पोटे यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला आहे. सभास्थळी घडलेले प्रसंग दाखवणे हा केवळ बातमीदाराचा व्यवसायिक भाग असून, यात बदनामीचा प्रश्न येत नाही, असे पत्रकार संघटनांचे म्हणणे आहे.
या प्रकाराला मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी संतापाने विरोध दर्शविला असून, “राजकीय वरदहस्त आणि पोलिसांचा धाक दाखवत पत्रकारांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत” असा इशारा दिला आहे.
या घटनेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया परिषद, रायगड प्रेस क्लब आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांनी तीव्र निषेध नोंदविला
