बिडकीन परिसरात गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद; ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई छत्रपती संभाजीनगर, दि. १४ जून २०२६ : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) बाळगणाऱ्या एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

बिडकीन परिसरात गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद; ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर, दि. १४ जून २०२६ : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) बाळगणाऱ्या एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना १३ जून रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, मुलानी वाडगाव येथून बिडकीनकडे एक इसम अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन येत आहे. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.(पैठण प्रतिनिधी इकबाल शेख)

यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने निलजगाव फाटा ते DMIC रोडवरील साई मशिनरी हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकलजवळ सापळा रचला.
छापा टाकल्यानंतर संशयित इसमाची चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव गणेश शिवाजी उघडे (वय २८), रा. मुलानी वाडगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक स्टीलचा गावठी कट्टा (मॅगझीनसह) आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली.
पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व ५ हजार रुपये किमतीची पाच जिवंत काडतुसे असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिडकीन पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोउपनि लहू घोडे, तसेच विठ्ठल डोके, सनी खरात, योगेश तरमाळे, जीवन घोलप आणि कोळगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली./अटींची कर्जमाफी मान्य नाही; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)ची मागणी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना' ही शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कर्जवसुलीचे साधन ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी केला आहे. या योजनेतील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने बिनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी पक्षाने केली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी व्हावे यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली./शाळा प्रवेशोत्सव अभियानात एमआयडीसी पैठण पोलिसांचा सहभाग; विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
पैठण, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने व पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात "शाळा प्रवेशोत्सव अभियान" उत्साहात राबविण्यात आले. या अभियानांतर्गत एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध जिल्हा परिषद शाळांना पोलीस अधिकारी, अंमलदार आणि पोलीस पाटील यांनी भेटी दिल्या.
या उपक्रमात २ पोलीस अधिकारी, १५ पुरुष व महिला पोलीस अंमलदार तसेच हद्दीतील १७ पोलीस पाटील सहभागी झाले होते. नव्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पोलीस विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाळांनी आयोजित केलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात पोलिसांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे आणि शाळेप्रती आकर्षण वाढावे या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले.
याशिवाय एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. रस्ता सुरक्षा आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजना, आपत्कालीन मदतीसाठी डायल 112 सेवेचा वापर, महिला व बाल सुरक्षा, सायबर गुन्हे प्रतिबंध तसेच विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी "गुड टच - बॅड टच" या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास संबंधित गावांचे सरपंच, शाळा प्रशासन, शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सहायक पोलीस निरीक्षक भरत उत्तम मोरे यांनी या अभियानाची माहिती दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

sx

1